Published On : Wed, Apr 11th, 2018

हे सरकार फेकूगिरी आणि गाजर दाखवणारे आहे – अजित पवार

Advertisement

Ajit Pawar
पुणे (भोसरी) : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत पोटनिवडणूकांमध्ये कमळाबाईला तीन नंबरवर समाधान मानावे लागले आहे.लोकांना आता कळू लागले आहे की,हे सरकार फेकूगिरी करणारे आहे,गाजर दाखवणारे सरकार आहे अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भोसरीच्या जाहीर सभेत केली.

भोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे भागांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी विशेष नातं आहे. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आस्थेवाईकपणे भोसरी येथील उपस्थित समुदायाची मनं जिंकली.

हल्लाबोल आंदोलनातील नवव्या दिवशी शेवटची जाहीर सभा भोसरी येथे प्रचंड अशा जनसमुदायासमोर पार पडली.

यावेळी दादा सभेला संबोधित करत होते. अजितदादा पुढे म्हणाले की, “आज या परिसरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, गुंडगिरी इथे वाढली आहे, ज्येष्ठ नागरिकांना येथे स्वतंत्रपणे वावरता येत नाही, अनेक समस्या आहेत, पण सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

या भागाच्या पाण्याच्या मीटिंगला मी उपस्थित होतो, आयुक्त उपस्थित होते, मात्र आमदार, नगरसेवक, कोणी उपस्थित नव्हते. आपल्या भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या विषया व्यतिरिक्त कोणते काम महत्त्वाचे आहे ? असा सवाल दादांनी केला.

Ajit Pawar
या सरकारमधील मंत्र्यांना माणुसकी उरली नाही. लोक आत्महत्या करतात आणि हे गाडया घेवून निघून जातात. आपण जिथे काम करतो तिथे काय घडत आहे हे पाहण्याचे साधे तारतम्य यांच्यात नाही.

बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे अभिनंदन फलक यांनी शहरभर लावले पण प्रत्यक्षात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही. सरकारच्या नियोजनात फार अभाव पडत आहे. काय करावे, काय नाही करावे, कोणते निर्णय घ्यावे, कोणते नाही ते या सरकारला कळत नाही असा आरोपही दादांनी केला.

आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. लोक या सरकारला नाकारू लागले आहेत. गुजरात कसंबसं वाचलं, भाजपाने करोडो रुपयांची पार्टी ऑफिस दिल्लीत बांधली आहेत. प्रत्येक राज्यात कोटयवधींची पक्षाची ऑफिसे बनवण्याचा यांचा संकल्प आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच पर्याय डोळ्यासमोर ठेवा. जास्तीतजास्त आमदार, खासदार निवडून द्या असे आवाहन दादांनी केले.

या सभेत आमदार शशिकांत शिंदे,आमदार जयदेव गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

NCP, bhosari sabha
या हल्लाबोल आंदोलनाला विधीमंडळ पक्षनेते अजित दादा, खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विलास लांडे, नगरसेवक जालिंदर शिंदे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पिंपरी चिंचवडचे नेते संजोग वाघेरे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयदेव गायकवाड,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक आदींसह भोसरी,चिंचवड परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Jayant Patil, NCP, Pune

NCP, bhosari sabha