विदर्भात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचा दावा करत या प्रकरणाची राज्यव्यापी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे उपनेते तथा आमदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. तुमाने यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे.
या घोटाळ्यात मंत्रालयात बसणारे सचिव स्तरावरील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण सामील असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याचे तुमाने यांनी पत्रात नमूद केले आहे. सद्यस्थितीत सुरू असलेली एसआयटी चौकशी महत्त्वाची असली तरी, या घोटाळ्याची व्याप्ती आणि त्यात गुंतलेले ‘मोठे मासे’ पाहता, केवळ विदर्भातील चौकशी पुरेशी नसल्याचे तुमाने यांचे म्हणणे आहे.
तुमाने यांनी आपल्या पत्रात, या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व शालार्थ आयडींची सखोल चौकशी करण्याची नम्र विनंती केली आहे. यामुळे घोटाळ्याचे मूळ शोधण्यास मदत होईल आणि दोषींवर कठोर कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
* गैरव्यवहार होणे अत्यंत चिंताजनक
अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे शासनाची प्रतिमा मलिन होते, तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते. शिक्षणसारख्या महत्त्वाच्या विभागात असे होत असल्याचे तुमाने यांनी पत्रात म्हटले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन, तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागातील पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी आशा तुमाने यांनी व्यक्त केली आहे.