File Pic
मुंबई: व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत असून हा निकाल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
व्यक्तिगत गोपनीयता हा व्यक्तीस्वातंत्र्याचा गाभा आहे. जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र केंद्र सरकारने व्यक्तीगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार नाही, अशी भूमिका न्यायालयात घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाने केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावत व्यक्तीगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या राज्य सरकारांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात व्यक्तीगत गोपनीयतेचा अधिकार हा मुलभूत अधिकाराच्या श्रेणीत ठेवण्याची मागणी केली होती. गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणण्याचे अनेक प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने आजचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा प्रत्येक भारतीयाचा विजय आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.