नागपूर : पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल ही महाराष्ट्रातील भविष्यातील परिवर्तनाची नांदी होय, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
पंढरपूरची पोटनिवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांना सहानुभूतीची मते मिळणे शक्य होते. एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेचे सुद्धा त्यांना थेट समर्थन होते. त्यांच्या प्रचारात तिनही पक्षांची नेते मंडळी उतरली होती. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार दाखल असलेल्या मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अगदी समोरून आभासी सभेला संबोधित केले होते. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान खासदार शरद पवार यांनी भर पावसात प्रचार सभा घेतली होती.
त्याच धर्तीवर सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयासमोरून आभासी सभेला संबोधित करून सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र पंढरपूरच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या निवडणूक क्लृप्त्यांना नाकारत विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आमोरासमोर निवडून दिले. ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची नांदी होय. भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीच्या कोणत्याही राजकारणाला बळी पडणार नाही. हेच या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे, अशीही प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.