मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ निर्माण झाली. आज ते भाजपात प्रवेश करत आहेत.यासंदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली. मी माझ्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात करतोय. मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होत आहे. माझ्या नव्या राजकीय आयुष्याची ही सुरुवात आहे. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी कुठल्याही कामासाठी घरातून निघताना पूजा करतो. हे नित्यनियम आहे. काँग्रेसचा विषय संपला आहे.
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द –
१९८२ मध्ये अशोक चव्हाणांनी सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते काम करत होते. १९८७ च्या नांदेड पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. शरद पवारांच्या सरकारमध्ये ते राज्यात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. २००८ आणि २००९ या काळात दोनदा अशोक चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१४ मध्ये मोदी लाटेतही नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण बहुमताने विजयी झाले.