नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या १३ खासदारांना निलंबित केल्यानंतर आज पुन्हा 31 खासदारांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह इतर खासदारांचा समावेश आहे. लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे.
गेल्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून काही तरूण लोकसभेत घुसले होते. त्यानंतर त्याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली.संसदेत झालेल्या या गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या 31 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांना निलंबित केल्याने विरोधकांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या ‘त्या’ 31 खासदारांची नावे –
अधीर रंजन चौधरी, के जय कुमार, अपूर्व पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार यांच्याशिवाय , अँटोनी अँटोनी, एसएस पलानामनिकम, अब्दुल खालिद, तिरुवरुस्कर, विजय बसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू, अशी त्या खासदारांची नावे आहेत.