
नागपूर -महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग कडून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा बंधनकारक करण्याचा नियम १ मे २०२६ पासून लागू केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले असून चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी महाराष्ट्र दिन पासून मुंबईसह राज्यभरातील रिक्षाचालकांना मराठी येणे आवश्यक ठरणार होते. मात्र, नव्या निर्णयानुसार या नियमाची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परप्रांतीय चालकांवरील परवाना रद्द होण्याची भीती आणि कारवाईची शक्यता सध्या टळली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आता चालकांना स्वातंत्र्यदिनपर्यंत मराठी शिकण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई होणार नसल्याचे संकेत आहेत. रिक्षाचालक संघटनांकडून संपाचा इशारा आणि प्रत्यक्ष अडचणी मांडल्यानंतर सरकारने ही नरम भूमिका घेतल्याचे समजते. अंतिम निर्णयाबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठी भाषा शिकणे आवश्यकच राहील. कामगार नेते शशांक राव यांच्यासह प्रतिनिधींनी मराठी शिकण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच संजय निरुपम यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत इतरांनीही भाषा आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.
रिक्षाचालक संघटनांनीही पुढाकार घेत चालकांसाठी मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारकडून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी मदत दिली जाणार आहे. सध्या दिलासा मिळाला असला तरी, मुदत संपल्यानंतर नियमांचे पालन बंधनकारक राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








