
नागपूर : मुस्लीम समाजाला वारंवार लक्ष्य करणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मांडली. मदरशांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून वास्तव वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेते नितेश राणे यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना खान म्हणाले की, मदरशांमध्ये सर्वेक्षण किंवा यादी तयार केल्याच्या चर्चा पूर्णपणे अचूक नाहीत. सरकारकडून ‘मॉडेल मदरसा’ संकल्पनेवर काम सुरू असून मदरशांमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले आहेत.
मदरसे आधुनिक; शासनाच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण-
नागपूरमध्ये आजही मोठे व सुसज्ज मदरसे कार्यरत आहेत. हे मदरसे शासनाच्या अभ्यासक्रमानुसार चालतात आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी व मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. २०१४ पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मात्र सध्याच्या काळात मदरसे आधुनिक पायाभूत सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, असे खान यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल झाल्याचा दावा त्यांनी केला.पूर्वी केवळ धार्मिक शिक्षणावर भर होता; आता आधुनिक व मुख्य प्रवाहातील शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मदरशांतील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकतात,” असेही ते म्हणाले.
“कोणी गीतेचा पाठ करतो किंवा कोणी कुराणाचा पाठ करतो, याला कट्टरता म्हणता येणार नाही. धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
७५ शाळांच्या प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी-
दरम्यान, ७५ शाळांच्या प्रमाणपत्र प्रकरणी खान आज मुंबईला रवाना होत आहेत. या प्रकरणात संबंधित संस्थांच्या संचालकांना बोलावून प्रथम चौकशी केली जाणार आहे. एका कॉर्पोरेट संस्थेला २५ शाळांची गरज का पडली, याची सविस्तर माहिती गोळा करून अहवाल सरकारसमोर सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात राज्यमंत्री पंकज भोयर देखील सक्रियपणे कारवाई करत असल्याचे त्यांनी नमूद केले. “सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम केल्यास मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
तेढ निर्माण करणारी वक्तव्ये थांबवावीत-
कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करणे योग्य नसून, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असे सांगत खान यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
“सरकार सकारात्मक काम करत असताना अशा वक्तव्यांमुळे त्या कामाला ब्रेक लागतो. त्यामुळे जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.








