Published On : Mon, Nov 26th, 2018

विहिरींच्या स्वच्छतेबाबत आठवडाभरात आढावा घ्या!

Advertisement

नागपूर : यंदा पुरेशा प्रमाणात पाउस न पडल्याने जलाशयामध्ये आवश्यकतेनुसार पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या पुढे उभी आहे. नागपूर शहरामध्ये एकूण ७८४ विहिर असून त्यापैकी ५४३ विहिर वापरण्याजोग्या अवस्थेत आहेत. यापैकी जलप्रदाय समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला ३४३ विहिर साफ करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र या विहिर साफ न करता केवळ येथील पाणी बाहेर फेकण्यात आल्याची तक्रार होत आहे. यासंबंधी येत्या आठवडाभरात आयुक्तांनी आढावा घ्यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

सोमवारी (ता. २६) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व साठा या संदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, उपनेते बाल्या बोरकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका संगीता गि-हे, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, अधिक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) प्रदीप राजगीरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, महेश मोरोणे, सुवर्णा दखने, स्मिता काळे, ओसीडब्ल्यूचे श्री. रॉय, श्री. सिंग, श्री. कालरा, राहुल कुळकर्णी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहराला पेंच जलाशयामधून पाणी पुरवठा करण्यात येतो. याशिवाय अतिरिक्त पाणी गोरेवाडा जलाशयामधून देण्यात येते. मात्र यंदा पेंच जलाशयामध्ये पाणीसाठा कमी आहे. शहरात ७८४ विहिर व ४९०० बोअरवेल आहेत. मात्र येथील पाण्याचा वापर कमी प्रमाणात होत आहे. या विहिर व बोअरवेलमधील पाण्याची चाचणीही आजपर्यंत करण्यात आली नाही. या पाण्याची तपासणी करण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, यासंबंधीही माहिती यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी मागितली. बोअरवेल व विहिरींमधील पाण्याची चाचणी करून बोअरवेलला लाल किंवा हिरवा रंग देण्यात यावे. याशिवाय या ठिकाणी त्यासंबंधी फलक लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

विहिर व बोअरवेलमधील पाण्याच्या चाचणीसाठी कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना सहजतेने पिण्याचे पाणी मिळेल, अशी आशाही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्‍यक्त केली.