
शिवनेरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. खासदार Supriya Sule यांनी शिवनेरी येथे माध्यमांशी संवाद साधताना मनातील भावना व्यक्त करत “आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा आहे; कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. मात्र या विषयाला सध्या पूर्णविराम देऊया,” असे स्पष्ट संकेत दिले.
अलिकडच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या नेत्यांमध्ये बैठकींची चर्चा रंगली होती. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठकांचे सत्र झाल्याच्या बातम्या समोर आल्या. बैठकींचे ठिकाण, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले नेते यावरही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र या सर्व चर्चांवर सुळे यांनी यापूर्वीच “रामकृष्ण हरी” असे उत्तर देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
रोहित पवारांच्या सुरक्षेची मागणी-
या वेळी त्यांनी रोहित पवार यांच्याबाबत चिंता व्यक्त केली. “रोहित अनेक मुद्दे मांडत आहेत. तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. पवार कुटुंबासह लाखो लोकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारने रोहित पवारांना सुरक्षा द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
पार्थ आणि जय यांनाही या घडामोडींमुळे धक्का बसल्याचे त्यांनी सूचित केले. “आम्हाला मोठ्यांविरुद्ध बोलणं आवडत नाही. वास्तव माझ्या दादाला माहिती होतं आणि मला माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी भावनिक सूर लावला.
अमोल कोल्हेंबाबत प्रश्नांवर टाळाटाळ-
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढाव्यात, तसेच Amol Kolhe यांना महत्त्वाचे पद देण्याच्या चर्चांबाबत विचारले असता, “अमोल दादा यांनी पक्षाची भूमिका सविस्तर मांडली आहे. वेगळं मला बोलावंसं वाटत नाही,” असे सांगत सुळे यांनी अधिक भाष्य टाळले.
विमान अपघातावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी
दरम्यान, अलीकडील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संसदेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पारदर्शक माहिती मिळेपर्यंत आमची मागणी सुरू राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकंदरित, विलिनीकरणाचा मुद्दा सध्या थंड बस्त्यात गेला असला तरी एकत्र काम करण्याची इच्छा कायम असल्याचा स्पष्ट संदेश सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणात पुढील काही दिवसांत कोणती नवी घडामोड घडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








