
नागपूर -मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह दिलेल्या भेटीनंतर निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गवई यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मानव यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत म्हणाले होते की, स्वतःला आंबेडकरी विचारांचा म्हणवणाऱ्या भूषण गवई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाया पडणे धक्कादायक आहे. “अशा व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते.
या टीकेला आता भूषण गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाजात वावरताना विविध ठिकाणी जाणे स्वाभाविक असते. अनेक आंबेडकरी नेतेही मंदिर, चर्च किंवा मशिदींना भेट देतात. मात्र, या मुद्द्यावर अनाठायी वाद निर्माण केला जात आहे.”
यावेळी त्यांनी श्याम मानव यांना थेट आव्हान देत म्हटले, “भूषणजींना रोखण्याआधी मला रोखा. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी एकटा, निशस्त्र येईल. तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझं आव्हान स्वीकारा.”
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत श्याम मानव यांच्यावर निशाणा साधला. “श्याम मानव कोण आहेत हे सांगणारे? त्यांना हा अधिकार कुणी दिला? ते काही सर्टिफिकेट वाटणारे नाहीत. अलिकडच्या काळात ते फक्त प्रसिद्धीसाठी अशी विधानं करत आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
या सर्व घडामोडींमुळे आंबेडकरी विचारसरणी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरून सुरू झालेला वाद आता अधिकच तापलेला दिसत आहे.








