
सातारा : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणारी २०२७ ची जनगणना आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत असून, या मोहिमेचा सातारा जिल्ह्यात आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या ‘कोयना दौलत’ निवासस्थानी स्वतः ‘स्व-गणना’ प्रक्रिया पूर्ण करत या उपक्रमाची सुरुवात केली.
“आपली जनगणना, आपला विकास” या घोषवाक्याखाली राबवली जाणारी ही मोहीम आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रारंभीच्या टप्प्यात घरांची नोंदणी आणि घरगणना केली जाणार असून, नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन माहिती भरता येणार आहे. देसाई यांनी डिजिटल पोर्टलवर ३३ प्रश्नांची उत्तरे देत स्वतःची नोंदणी पूर्ण केली आणि ११ अंकी ‘SE ID’ प्राप्त केला.
यावेळी बोलताना देसाई यांनी जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ही प्रक्रिया केवळ लोकसंख्येची मोजणी नसून भविष्यातील धोरणे आणि विकास आराखडे तयार करण्याचा पाया आहे. त्यामुळे सातारकरांनी पुढाकार घेऊन ‘स्व-गणना’मध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.
१ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने माहिती भरता येणार आहे. मोबाईलवर येणाऱ्या OTPच्या मदतीने नोंदणी पूर्ण करता येते तसेच नकाशावर घराचे अचूक स्थान निश्चित करणेही सोपे झाले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारा ‘SE ID’ सुरक्षित ठेवावा आणि प्रगणक भेट देईल तेव्हा तो दाखवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनगणना हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून, या डिजिटल उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले.








