
नागपूर : पार्टीला गेलेले दोन तरुण परतताना काळाने गाठले. बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंगा टोली परिसरात बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दुचाकी अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये आर्यन रवींद्र सोनटक्के (१९, रा. यवतमाळ) आणि सक्षम विनोद बनसोड (२०, रा. बेसा, मूळ रा. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. आर्यन हा यवतमाळमधील नामांकित वकिलाचा मुलगा तर सक्षम हा चंद्रपूर येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीशाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात बी.ए. एल.एल.बी. (ऑनर्स) अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्रात शिक्षण घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोघेही दुचाकीने (एमएच ४९ सीआर १४५७) पार्टीसाठी बाहेर पडले होते. रात्री उशिरा वसतिगृहाकडे परतताना विद्यापीठापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले. गाडी उसळून दोघेही रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात पडले. दगडावर जोरात आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात अंधार आणि निर्जनता असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. दोघेही रात्रभर जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. गुरुवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर बुटीबोरी पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री वसतिगृहातील उपस्थितीवेळी सक्षम अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पालकांना माहिती दिली होती. पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही फोन लागत नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.








