Published On : Fri, Apr 19th, 2019

सोशल मिडिया वर विकासकारणाला बगल: अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

Advertisement

राजकीय पक्षांकडून आगपाखडच अधिक, कसे मिळणार बहुमत?

नागपूर: संपूर्ण समाजमन ढवळून काढण्याची क्षमता असलेल्या सोशल मिडियावर निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आगपाखडच अधिक केली जात आहे. सोशल मिडियातून विकासाचे मुद्दे वापरून नागरिकांवर प्रभाव पाडण्याची संधी असताना राजकीय पक्षांकडून सोशल मिडियावर विकासकारणाला बगल दिली असल्याचे सुक्ष्म निरीक्षण नोंदवित सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत कसे मिळेल? असा सवाल उपस्थित केला.

विदर्भातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियाचा भरभरून वापर केला. मात्र, सोशल मिडियाच्या व्यासपीठावर राजकीय मार्केटिंग सुरू असून सत्ताकारणातून निर्माण झालेली जाती, धर्माची समिकरणेच अधिक प्रभावी मांडण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत सोशल मिडिया विश्लेषक पारसे यांनी व्यक्त केली. जाती, धर्मावरून वाढलेले दीर्घकालीन वैमनस्य देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण करणारे आहे याकडे राजकीय पक्षांद्वारे दुर्लक्ष होत आहे. सोशल मिडियावर कुठलेही बंधन व वैयक्तिक मर्यादा नसल्याने संपूर्ण आकडेवारीसह विकासाचे मुद्दे मांडणे सहज शक्य आहे. एकविसाव्या शतकातील पिढी केवळ विकासकारणावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे सोशल मिडियावर आल्यास राजकीय पक्षांना सत्तेत आल्यानंतर देशात शांतता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यास बळ मिळेल. परंतु सत्ताकारणामुळे सर्वच पक्षाकडून सोशल मिडियावर विकासाच्या मुद्‌द्‌याला बगल देण्यात आली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ३६०० कोटींचा १४ पदरी दिल्ली-मेरठ महामार्ग तयार केला ज्यामुळे अदमासे २० लक्ष नागरिक दररोज यातायात करीत आहेत. ज्यामुळे भविष्यात पश्चिम उत्तर प्रदेश जागतिक बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर आहे . चीनी तंत्रज्ञांनी या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून , अभ्यास करीत जागतिक स्तरावर स्तुती केली. परंतु पक्षस्तरावर याची नोंदच नाही. गडकरींनी उत्तरप्रदेशात विकासाचे बीजे रोवली. याचा प्रचारादरम्यान सोशल मिडियात उल्लेखही नाही.

मात्र उत्तरप्रदेशात ३६०० कोटींचेच हत्तीचे पुतळे तयार करण्याचा मुद्दा सोशल मिडियावर झळकला. उजनी धरणाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सोशल मिडियावर ‘ट्रोल’ करून नकारात्मक प्रचार झाला. मात्र, बारामतीत कृषी क्रांती घडविण्यात आली, पुण्याला आयटी शहराच्या यादीत मानाचे स्थान त्यांनी मिळवून देत २० लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. अजित पवारांचे हे विकासकारण सोशल मिडियावर मांडले गेले नाही.

प्रकाश आंबेडकरांनी नागरिकांना तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडूनही विकास कारणाचे कुठलेही आश् वासन, आराखडा सोशल मीडिया वर आला नाही, असेही पारसे म्हणाले. ५० कोटी तरुणाईला फक्त विकासाची अपेक्षा आहे. राजकीय पक्षांनी तरुणाईला जात व धर्मकारणापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरजही पारसे यांनी व्यक्त केली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ३६०० कोटींचा अभूतपूर्व दिल्ली-मेरठ महामार्ग तयार केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कृषी क्रांती घडवली, पुण्याला आयटी शहराच्या यादीत मानाचे स्थान त्यांनी मिळवून देत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला. अश्या मूळ विकासाच्या मुद्याला सोशल मिडियातील प्रचारातून बगल देण्यात आली. कुठल्याही पक्षाला फक्त विकासाच्या मुद्‌द्‌यावरून १०० % बहुमत गाठता येईल, परंतु या विकासकारणाकडे सोशल मीडिया वर दुर्लक्ष झाले आहे. अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.