मुंबई : शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिराती प्रत्येक वृत्तपत्रात छापण्यात आली. या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते काल (१५ जून) पालघरमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते.
एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही, असे फडणवीस म्हणाले.
मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एक पत्रकार आला आणि म्हणाला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? त्यावर मी म्हणालो की, आमचा २५ वर्षांपासून एकत्रच प्रवास सुरु आहे. मात्र गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही.
राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे म्हणून तयार केले आहे. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारे सरकार असल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच हे जुने सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचे यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले, असा घाणघातही फडणवीस यांनी केला.