Published On : Sat, Apr 15th, 2017

Sindhudurg: 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

Advertisement
Boy Drowns

Representational Pic


सिंधुदुर्ग (Sindhudurg)
: सहलीसाठी समुद्र किनाऱ्यावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटातील 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मालवण तालूक्यातील वायरी समुद्र किनाऱ्यावर घडली. मृतांमध्ये 5 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिनींचा समावेश आहे. मृतांमधील सर्वजण बेळगावातील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, बेळगावातील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजच्या 60 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहलीवर होता. ही सहल सिंधुदूर्गातील मालवण (Sindhudurg Malwan) तालूक्यातील वायरी किनाऱ्यावर आली. यावेळी समुद्राला भरती होती. सहलीतील काही विद्यार्थी किनाऱ्याने समुद्रात उतरले. भरतीची वेळ असल्यामुळे या विद्यार्थ्यांना वाढत्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 मुलं आणि 3 मुलींचा मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समजली नाहीत.

दरम्यान, बुडत असलेल्या इतर तिघांना वाचविण्यात उपस्थितांना यश आले. मात्र, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. वाचविण्यात आलेल्या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गटनेचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांसोबत सहलीसाठी आलेल्या शिक्षिकेला मानसीक धक्का बसला आणि त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिस वायरी समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. त्यानंतर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सहलीवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यभरातील विवीध समुद्र किनाऱ्यांवर बुडून मृत्यू पावण्याचे प्रमाण मोठे आहे. बुडून मृत्यू पावलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेकडे लक्ष देण्यात यायला हवे, अशी भूमिका किनाऱ्यावरील पर्यटक आणि नागरीक व्यक्त करतात.