
नागपूर – शहरातील धंतोली परिसरातील जुने पोस्ट ऑफिस कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता अचानक फ्रॅण्ड्स कॉलनी येथे हलविण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. १ मार्चपासून नवीन ठिकाणी कामकाज सुरू होणार असून, यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला खातेधारक आणि आरडी एजंटांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
दशकांपासूनची सेवा थांबली-
धंतोली उद्यानासमोर अनेक वर्षांपासून सुरू असलेले पोस्ट ऑफिस परिसरातील रहिवाशांसाठी अत्यंत सोयीचे होते. मात्र, आता हे कार्यालय सुमारे ७ ते १० किलोमीटर दूर हलवण्यात आले आहे. परिणामी, रोजच्या व्यवहारासाठी नागरिकांना अतिरिक्त अंतर कापावे लागणार आहे.
एलआयसी इमारतीत जागा उपलब्ध, तरीही स्थलांतर
धंतोलीतील जुन्या इमारतीच्या जागी Life Insurance Corporation of India (एलआयसी) ने नवी प्रशस्त इमारत उभारली आहे. या ठिकाणी पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. परंतु दरमहा ३० हजार रुपये भाडे परवडत नसल्याचे कारण देत पोस्ट विभागाने स्थलांतराचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, वर्धा रोडवरील हितवाद परिसरातील पोस्ट ऑफिसही मानकापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे धंतोली आणि आसपासच्या भागातील दोन महत्त्वाची कार्यालये दूर गेल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.
४० हजार खात्यांचे स्थलांतर काँग्रेसनगरला-
धंतोलीतील सुमारे ४० हजार खातेधारकांची खाती काँग्रेसनगर पोस्ट कार्यालयाकडे वळविण्यात आली आहेत. मात्र हे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना जिना चढणे कठीण ठरत आहे. अधिकाऱ्यांनी “कर्मचारी खाली येऊन सेवा देतील” असे सांगितले असले, तरी नागरिकांनी या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
२० हजार चौ.मी. परिसरावर विकास प्रकल्पाची चर्चा
धंतोलीतील एलआयसी क्वार्टरचा सुमारे २० हजार चौरस मीटर परिसर खासगी बिल्डरला देण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. येथे व्यावसायिक संकुल आणि निवासी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील हिरवळ आणि मोकळी जागा नाहीशी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकप्रतिनिधींना हस्तक्षेपाची मागणी-
या निर्णयाविरोधात स्थानिकांनी तीव्र भूमिका घेतली असून, प्रभाग क्रमांक १५ मधील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदन देण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे.
धंतोली पोस्ट ऑफिसचे स्थलांतर हा नियोजनाअभावी घेतलेला निर्णय असल्याचा आरोप होत असून, प्रशासनाने नागरिकांच्या सोयीचा गांभीर्याने विचार करावा, अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे.








