Published On : Thu, Jan 23rd, 2020

समाजासमाजात बटवारा करण्याचे काम आजचे भाजप सरकार करतेय – शरद पवार

Advertisement

अल्पसंख्याक सेलची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली…

मुंबई :समाजासमाजात बटवारा करण्याचे काम आजची भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणं चुकीचं आहे त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालयात पार पडली.

अल्पसंख्याक समाजाची समस्या आहे. त्यांच्या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचं असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही हिस्सा आहे. ज्यामध्ये भारतातील काही लोक रहात आहेत त्यांना आपल्या देशात परत यावं वाटत आहे. त्यांचा तो अधिकार आहे परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले.

अल्पसंख्याक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचं आहे असेही शरद पवार म्हणाले.

NRC, CAA यामुळे मुस्लिम समाजाला नजरअंदाज केलं जात आहे. तर दुसरीकडे
व्हिजेेएनटीचे जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जाग्यावर रहात नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावं लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे ही वेळ या भाजपाने आणली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

काही लोक श्रीलंकेमध्ये जन्मलेले आहेत त्यांनाही भारतात यायचं आहे. परंतु आजच्या सरकारने जो कायदा केला आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला नाही असेही शरद पवार म्हणाले.

अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा असे मला सांगण्यात आले होते.त्यानुसार नवाब मलिक यांच्यावर या खात्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देवू – अजित पवार

महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे.त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले.

सरकार चालवताना अनेक अडीअडचणी आहेत.मात्र तरीही आपल्या विभागाला कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला दिला.

अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम करु – जयंत पाटील

राज्यात अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपलं आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आपली जबाबदारी आहे.अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी नवाबभाई मलिक यांच्यावर विश्वासाने पवारसाहेबांनी टाकली आहे. त्यामुळे आता अधिक प्रभावी काम अल्पसंख्याक सेलचे झाले पाहिजे. शिबीरे घेतली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांनी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक खाती आपल्या पक्षाकडे घेतली आहे असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील मुस्लिम युवक आहेत. त्यांना शिक्षणासाठी फी देण्याची जबाबदारी नवाब भाई मलिक यांनी आपल्या खात्यातून घ्यावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

या बैठकीत अल्पसंख्याक मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी शब्बीर विद्रोही, माजिद मेमन, गफार मलिक यांनी आपले विचार मांडले.

या बैठकीच्यावेळी आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.