Published On : Wed, Jan 15th, 2020

रिकाम्या भूखंडावर स्वच्छता नसल्यास होणार जप्तीची कारवाई : महापौर संदीप जोशी

Advertisement

‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत जिजामाता उद्यानात साधला संवाद

नागपूर: रिकामे भूखंड स्वच्छ ठेवणे ही त्या भूखंड मालकाची जबाबदारी आहे. त्यावर होणाऱ्या कचऱ्यामुळे, दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होता कामा नये. यापुढे असे आढळल्यास नागपूर महानगरपालिका ते जप्त करून महानगरपालिकेच्या मालकीचा असल्याचा फलक लावेल. यासाठी कायदा असून त्यासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेत पुढील काही दिवसात त्याच्या नियमावलीला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांना दिली.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत छत्रपती नगरातील जिजामाता उद्यानात महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका लक्ष्मी यादव, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, ॲड. देव, साहेबराव इंगळे, डॉ. अशोक पाटील, राजू मुंडले, श्री. वागदे उपस्थित होते.

यावेळी उद्यानात उपस्थित नागरिकांशी महापौर संदीप जोशी यांनी संवाद साधला. सीमा बांगर, श्रीमती सातपुते यांच्यासह काही नागरिकांनी परिसरात असलेल्या रिकाम्या भूखंडांची समस्या मांडली. ज्यांचे भूखंड आहेत त्यांनी त्याला सुरक्षा भिंत बांधून तेथे कचरा होणार नाही, मच्छरांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र, त्या भूखंडावर गुरे-ढोरे बांधले जातात. घाण केली जाते. त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात. यावर गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. यावरच महापौर संदीप जोशी यांनी यासाठी असलेला कायदा नागपूर महानगरपालिका लवकरच अंमलात आणणार असल्याची माहिती त्यांना दिली. आपण स्वत: ३१ जानेवारीपूर्वी तक्रारकर्त्यांच्या मागील भूखंडावर फलक लावण्यास येऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Advertisement

अशोकसिंग दीक्षित यांनी जिजामात उद्यानाचे कंपाऊंड तुटले असल्याचे सांगितले. छत्रपती सभागृहासमोरील चौकात सिग्नल लावण्याची सूचना केली. राम नख्खनवार यांनी उद्यानातील नवीन प्रसाधानगृह तीन महिन्यांपासून तयार आहे. मात्र, पाण्याअभावी किंवा अन्य कारणामुळे ते नागरिकांच्या सेवेत सुरू केले नसल्याची बाब लक्षात आणून दिली. विद्युत दिवे प्रकाश असताना लागतात, रात्री बंद होतात, ही बाब लक्षात आणून दिली. भाग्योदय ले-आऊटमधील प्रभाकर डोकरीमारे यांनी रस्त्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. मेहेर कॉलनीतील श्रीकांत नाईक यांनी नवे रस्ते तयार झाले की तातडीने खोदले जातात, ही बाब लक्षात आणून देत यामुळे विकासनिधीचा अपव्यय होत असल्याचे सांगितले. नरेंद्रनगर पुलाखाली चार चेंबर आहेत.

ते चोक आहेत. आऊटलेट मातीने बुजले आहेत. त्यामुळे पुलाखाली पाऊस नसतानाही पाणी साचले रहात असल्याचे नंदुजी पवनीकर यांनी सांगितले. नागभूमी ले-आऊटमध्ये रस्त्याचे कामे करण्यात यावे, अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी किरण भोयर यांनी केली. छत्रपती नगर परिसरात पाणी बिल भरणा केंद्र उघडण्यात यावे, असे मधुसूदन पुणेकर यांनी सुचविले. प्रभाकर जिभकाटे आणि अन्य काही नागरिकांनी मोकाट कुत्र्यांची समस्या मांडली. डॉक्टर्स कॉलनीच्या नागरिकांनी तेथील समस्यांचा पाढा वाचला. जिजामाता उद्यानातील ग्रीन जीमची देखभाल होत नसल्याचे मदनलाल मोखा यांनी सांगितले. उद्यानातील योग शेडची दुरुस्ती करण्यात यावी आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी योगशिक्षक मानेकर यांनी केली. पांडे ले-आऊट ते खेता ले-आऊट मधील कचरा उचलला जात नाही. विद्युत दिवे बंद असल्याचे अर्चना लवटावे यांनी सांगितले. डॉ. डोईफोडे, अरुण करडे, श्री. आष्टनकर, कीर्ती प्रतापवार, जे.के. सराफ, दीपक इंगळे, पूजा नाखले, दिलीप राऊत, सुरेश मानकर, समीर खरे, ॲड. ए.जी. वाघमारे यांनीही परिसरातील विविध समस्या मांडल्या आणि चांगल्या कामांचे कौतुकही केले.

संपूर्ण समस्या ऐकल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांना त्यांच्या प्रत्येक समस्यांची दखल घेण्यात येईल, याबद्दल आश्वस्त केले. नागपुरातील मोकाट कुत्र्यांची समस्या मोठी आहे. पण कुत्रयांची नसबंदीशिवाय काहीही करता येत नाही. यासाठी दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली असून शहरातील ८० हजार कुत्र्यांपैकी ७२ हजार कुत्र्यांवर वर्षभरात नसबंदी करण्यात येईल. यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र नगर पुलाच्या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, याबाबतही त्यांनी आश्वस्त केले.

उद्यानातील नवनिर्मित प्रसाधन गृहाबाबत माहिती घेऊन दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. पाच कोटींच्या महापौर निधीतून नागपूर शहरात सुमारे १०० स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्र केली असून १५ दिवसांत ७० ट्रक सामान जप्त केले. मात्र त्यासाठीही आता कडक कायदा मंजूर करवून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी छत्रपती नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.