Published On : Sat, Feb 24th, 2018

सावरकरांच्‍या साहित्‍य व चिंतनातील सर्वसमावेशक विचारांना जनसमर्थन मिळणे आवश्‍यक: नितीन गडकरी

Advertisement


नागपूर: जगभरात विस्‍तारवादी भूमिकेमूळे आपलीच विचारसरणी श्रेष्‍ठ अशी स्थिती असतांना स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या साहित्‍यकृतीमधे असणारा सर्वसमावेशक विचार हा लोकापर्यंत पोहचून त्‍यास जनसमर्थन मिळणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. स्‍वातंत्र्यवीर सावरकर समिति नागपूर व महाराष्‍ट्र राज्‍य संस्‍कृती मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने स्‍थानिक विदर्भ साहित्‍य संघाच्‍या सांस्‍कृतिक सभागृहात दि. 24 ते 25 फेब्रुवारी दरम्‍यान आयोजित स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी विशेष अतिथी म्‍हणून ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाच्‍या उद्घाटक म्‍हणून लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर, संमेलनाअध्‍यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ.वि.स. जोग व संमेलनाच्या स्वागताध्‍यक्ष सौ. कांचन गडकरी प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या.

सावरकरांचा व त्यांचा परिवाराचा त्‍याग हा भारतीय इतिहासामधे अतुलनीय आहे. भारतीय जीवन पद्धतीवर आधारित राष्‍ट्रनिर्माण झाले पाहिजे, असे मत सावरकरांचे होते. सावरकरांचे विचार हे साहित्‍य संमेलन, गीत, चित्रपट व नाटक अशा सामा‍जप्रबोधनाच्‍या माध्‍यमातून नव्या पीढीपर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे, असे मत श्री. गडकरी यांनी याप्रसंगी मांडले.

स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा हा मंच म्‍हणजे समरसतेचा व विचारांची दालने उघडी करणारा मंच आहे. सावरकर हे जाज्‍वल्‍य राष्‍ट्रभक्‍तीने ओतप्रोत असणारे एक साहित्यीक व्‍यक्‍तीत्‍व होते. त्‍यांच्‍या कवितांमधून दिसणारे सौंदर्यदर्शन व कल्‍पनाविलास हा त्‍यांच्‍या उत्‍कृष्‍ठ साहित्‍यीक वृत्‍तीचा परिचय देतो. असा साहित्यीक व राष्‍ट्रभक्‍त देशाला लाभणे हे देशाचे भाग्‍यच आहे. साहित्‍यनिर्मितीचे चिंतन हे राष्‍ट्राचे संरक्षण व हित साधण्‍याकरिता असावे, असे आवाहन सावरकरांनी साहित्‍यीकांनी केले होते, अशी माहिती संमेलनाच्‍या उद्घाटक व लोकसभा अध्‍यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी याप्रसंगी दिली.


रशियात झालेल्‍या क्रांतीमूळे साहित्‍यीकांना नवसृजनाचे बळ मिळाले. सावरकरांनी या क्रांतीचे ‘एक जीवनक्रांती’ म्‍हणून कौतुकही केले. अशा सर्वसमावेशक प्रवृत्‍तीचे सावरकर हे आपल्‍या साहित्‍यकृतीतून भारतीय स्‍वातंत्र्यलढयात क्रातिकारांचे प्रेरणास्‍त्रोत ठरले, असे मत संमेलनाध्‍यक्ष डॉ.वि.स. जोग यांनी अध्‍यक्षीय भाषणातून व्‍यक्‍त केले.

सावरकर साहित्‍य संमेलनाप्रसंगी सावरकरांचे वाड्मयविश्‍व एकात्‍मता, समरसता, एकविसावे शतक व सावरकर विचाराची सार्थकता, अष्‍टपैलू युगपुरूष सावरकर या विषयांवर परिसंवाद होणार असून या संमेलनाचे स्‍वरूप केवळ उत्‍सवी न राहता ते विचारप्रवर्तक व्हावे व सावरकरांचे विचार हे तरूणांपर्यंत पोहचावेत, हा संमेलनाच्‍या आयोजनामागील प्रमुख उद्देश अ‍सल्याचे स्वागताध्‍यक्ष श्रीमती कांचन गडकरी यांनी यावेळी सांगितले.


याप्रसंगी ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकांचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप दि 25 जानेवारी दुपारी 3.30 वाजता होणार असून शिवकथाकार श्री. सद्‌गुरुदास महाराज यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला सावरकर दर्शन प्रतिष्‍ठान, मुंबई, स्‍वातंत्रयवीर सावरकर समिती, नागपूर, स्‍वा. सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, मुंबई या संघटनाचे प्रतिनिधी, तसेच शहरातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते. संमेलनाच्‍या उद्घाटकीय सत्राचे सूत्र संचालन प्रा. विवेक अलोणी व डॉ. शुभा साठे यांनी केले.