
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नींबाबत समोर आलेल्या ‘तीन पासपोर्ट’ प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केल्याची चर्चा आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या पत्रात संबंधित मुद्दा “अत्यंत गंभीर” असल्याचे नमूद करत, इतक्या संवेदनशील प्रकरणावर अद्याप ठोस कारवाई का करण्यात आलेली नाही, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असू शकणाऱ्या या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचीही खंत व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, सत्ताधारी गोटातही अस्वस्थता वाढल्याची चर्चा रंगली आहे. संघाकडून अशा प्रकारे थेट हस्तक्षेप होणे दुर्मीळ मानले जात असल्याने या पत्राचे दूरगामी परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे इजिप्त, यूएई आणि अँटिग्वा-बार्बुडा या तीन देशांचे पासपोर्ट असून परदेशातील मालमत्तेची माहिती लपवण्यात आली आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हिमंता बिस्वा सरमा यांनी सर्व आरोप फेटाळले असून, हे दावे “AI-निर्मित” आणि राजकीय हेतूने पसरवलेले असल्याचे स्पष्ट केले आहे. तर रिनिकी भुयान सरमा यांनीही आरोप नाकारत संबंधितांविरोधात एफआयआर दाखल केला असून मानहानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणामुळे संघ आणि भाजपमधील संबंधांवरही चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








