नागपूर :- सेवानिवृत्तीचा क्षण जसजसा जवळ येतो, तसतसा आपण कामाच्या व्यापापासून सेवामुक्त होऊ ही ओढ मनाला लागली असते. तसेच निवृत्त झाल्यानंतर आपण आपल्या सहकाऱ्याला भेटणार नाही हे दु:ख जाणवत असते. सेवानिवृत्ती हे सुख आणि दु:ख यांचा सुवर्णसंगम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सेवानिवृत्तीपर भाषणात केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी व शिपाई किशोर टिपे यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. ठाकरे म्हणाले, सत्कारमूर्ती रवींद्र खजांजी यांनी नेहमी सहकार्याच्या भावनेतून काम केले आहे. शासकीय कामकाजात अनेक अडी-अडचणी येतात. परंतु, मनावर कोणताही ताण न ठेवता आपल्या कामात समाधानी राहावे, ही जमेची बाजू आहे. सेवानिवृत्ती काळात कोणत्याही अडचणी तसेच जबाबदारी सोडविण्यात आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे ते म्हणाले.
गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात आम्ही एकत्रित सेवा केलेली आहे. पुरपरिस्थिती सारख्या प्रसंगात उत्तम रितीने काम केले असल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले. श्री खजांजी यांनी तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले असून चांगले निर्णय घेतलेले आहे. त्याबरोबरच कोरोना प्रतिबंधाच्या कामात उत्कृष्ट कार्य केले आहे.
सत्कारमूर्ती श्री. खजांजी यांनी आपल्या 36 वर्षाच्या सेवाकाळातील अनेक आठवणी विषद करून सुरवातीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील पुरपरिस्थितीमध्ये हेलिकॉप्टरने प्रवास हा जीवनातील आनंदाचा क्षण होता, असे सांगितले. सेवाकाळात 21 जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम केले असून यांचे मार्गदर्शन व सहकार्य प्रेरणादायी ठरले. इमाने इतबारे काम करावे, सहकाऱ्यांशी सहकार्याची भुमिका ठेवणे महत्वाचे असून कायद्याने काम करावे, असे मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात अनेक नवखे काम करण्याची संधी मिळाली असून ते योग्य रितीने पार पाडले.
महसूल असा विभाग आहे, ज्यात सरकार पगार देऊन समाजसेवा घडविते यामुळे एकाद्याचे भविष्य निर्माण होते, अशा सुखद घटनांमुळे जीवनात आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. अरविंद कातडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्कारमुर्ती रवींद्र खजांजी व शिपाई किशोर टिपे यांचा जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.