Published On : Wed, Apr 29th, 2020

भाजपच्या महिला आघाडीने सांभाळलीय सुरक्षेची जबाबदारी

Advertisement

मास्क तयार करण्यासाठी १० केंद्र : १० हजारांवर मास्कची निर्मिती

नागपूर : जगभर कोरोना वायरसने थैमान घातला असला तरी आजही अनेक माणसांना घरी बसून राहता येत नाही. अनेकांना महत्वाच्या ड्युटीसाठी तर काहींना समाजसेवेसाठी बाहेर पडावे लागत आहे. अश्यावेळी त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. या सुरक्षेमध्ये सर्वात महत्वाचे आहे ते तोंडाला मास्क लावणे. नाकातोंडावाटे शरीरात प्रवेश करणारा हा रोग नंतर अत्यंत जीवघेणे रूप घेतो, त्यामुळे प्रत्येकाने निदान मास्कचा उपयोग करणे गरजेचे आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे इतक्या माणसांना सुरक्षेची साधने बाजारातून उपलब्ध होणे शक्य होत नाही. म्हणून भाजपाच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सर्वांनी सुरक्षित पद्धतीने आजपर्यंत १०१५० मास्क तयार करून सेवेकरी आणि गरजवंतांमध्ये वाटप केले आहे.

सध्या महिला आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या कीर्तिदा अजमेरा यांच्या मार्गदर्शनात विविध पदांवर असूनही या संकट काळात जबाबदारी घेऊन मास्क तयार करून देण्याचे हे सेवाकार्य या महिला करीत आहेत. शहरभरात १० केंद्र तयार करून वेगवेगळ्या कार्यकर्त्या महिलांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या थानाचे कापड मास्क बनवण्यासाठी वापरले जात असून प्रशिक्षित शिलाई करणाऱ्या महिलांना सुरक्षेचे सगळे नियम समजावून ते शिवून घेतले जात आहेत.

वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध केंद्रांवर आतापर्यंत १०,१५० मास्क तयार केले गेले, जे सेवाकार्यात लागलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत तसेच नगरसेवकांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रभागातील गरीब वस्त्यांमध्ये आणि गरजूवंतांमध्ये वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकट काळात आमचाही हातभार या देशकार्यात लागत असल्याचे समाधान या कार्यात सहभाग घेणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. ”गरजू महिलांकडून हे मास्क शिवून घेण्याने त्यांना रोजगार देखील उपलब्ध होतो त्यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठीही ह्याची मदत होत असल्याचे समाधान आहे” असे यावेळी कीर्तिदा अजमेरा ह्यांनी सांगितले.

कोणी किती मास्क केलीत?
मास्क तयार करण्यासाठी जी १० केंद्र शहरात तयार करण्यात आली आहेत, त्या केंद्राची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वातील केंद्रावर आतापर्यंत सात हजार मास्क तयार करण्यात आले.

अनसुया गुप्ता यांच्या नेतृत्वातील केंद्रावर १७००, दमयंती पटेल यांच्या नेतृत्वातील केंद्रावर ३००, सगुण कूकुलारी यांच्या केंद्रावर २००, श्रद्धा पाठक यांच्या नेतृत्वातील केंद्रावर २००, नीलिमा बावणे यांच्या केंद्रावर २००, संध्या नारखेडे यांच्या केंद्रावर १५०, माया हाडे यांच्या केंद्रावर १५०, प्रतिभा वैरागडे यांच्या केंद्रावर १०० तर पल्लवी शामकुळे यांच्या केंद्रावर १५० मास्क आतापर्यंत तयार करण्यात आले.