Published On : Fri, Jan 26th, 2018

६९ वा प्रजासत्ताक दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना, नागरिकांना संबोधन

Advertisement


मुंबई: एकोणसत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांची शुक्रवारी (दि. २६) शिवाजी पार्क येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळयात राष्ट्रध्वजाला आपली मानवंदना दिली. राज्यपालांनी समारंभीय परेडचे निरीक्षण केले तसेच नागरिकांना उद्देशून संबोधन केले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, लोक प्रतिनिधी, मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, संरक्षण दल, पोलिस तसेच प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व नागरिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपालांचे राज भवन येथे झेंडावंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज भवन येथे झेंडावंदन केले तसेच उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापनदिना निमित्त शिवाजी पार्क, मुंबई येथे, शुक्रवार, दिनांक 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.00 देण्यात आलेले भाषण.


बंधू आणि भगिनींनो,

भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी, मी, महाराष्ट्राच्या जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा देतो. भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना मी आदरांजली वाहतो.

2. माझ्या शासनाने, समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

3. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दर्जाची स्मारके उभारण्याचे काम अगोदरच सुरू झाले आहे.


4. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग यांच्या कल्याणाची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग हा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपयांवरून 8 लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे.

5. शासनाने, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तयार केली असून, या योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील 6 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. शासनाने, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल 400 कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे.

6. मला हे सांगताना अभिमान वाटतो की, महाराष्ट्राने मागील 4 वर्षांमध्ये 9 टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला आहे.

7. राज्याच्या कृषि व कृषि संलग्न क्षेत्राने 12.5 टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक 30 टक्क्यांपर्यंत वाढली असून, महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषिक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत, राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने, विदर्भ आणि मराठवाड्याच्या 11 जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दुग्धव्यवसाय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

8. कर्जबाजारी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या हेतूने, शासनाने, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याद्वारे 23,102 कोटी रुपये इतकी रक्कम, 47 लाख 86 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.


9. मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत, महाराष्ट्रातील 11 हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. त्या अभियानाअंतर्गत सुमारे 4लाख 25 हजार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याद्वारे 16.82 टीसीएम इतक्या क्षमतेचा जलसाठा निर्माण करण्यात आला आहे.

10. “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना” या अंतर्गत 31, 549 धरणांमधील गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत, सुमारे 2 हजार धरणांतून 92 लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. “मागेल त्याला शेततळे” योजनेअंतर्गत 56 हजारांहून अधिक शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

11. देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अधिक पसंतीचे राज्य राहिले आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 मध्ये राज्याला 1.3 लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे.


12. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, राज्य शासनाने अलिकडेच महिला उद्योजिकांना समर्पित औद्योगिक धोरणास मंजुरी दिली आहे.

13. मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, राज्याने फेब्रुवारी महिन्यात पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” आयोजित केली आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल, गुंतवणूक प्रक्रिया सुलभ होईल आणि “मेक इन इंडिया” कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळणार आहे.

14. उद्योजकांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या हेतूने माझ्या शासनाने अलिकडेच इनोवेशन ॲण्ड स्टार्ट – अप पॉलिसीला मान्यता दिली आहे. कौशल्य भारत अभियानाअंतर्गत राज्याने आठ लाखांहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिलेले आहे.

15. नागरिकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी, संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 226 रेल्वेपूलांसह, 742 उड्डाणपूलांची