लाखोंची उलाढाल : हेरगिरी करणाऱ्या टोळीवर तस्करांकडून लाखोंची उधळण
Representational Pic
पांढरकवडा : पांढरकवडा तालुक्यातून नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यांना जोडणारा मुख्य सेतू असून या मार्गाने दररोज राजरोसपणे फंटरच्या मदतीने जनावरांची तस्करी केली जात आहे. या धंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या महामार्गामुळे औद्योगिक कंपन्यांना कच्चा माल पुरवणे व तयार माल इतरत्र पुरवणे जलद गतीने होते. परंतु याचाच फायदा जनावरांचे तस्कर घेत आहेत. महाराष्ट्र राज्यात गोहत्या गोवंश हत्या व वाहतूक बंदी कायदा लागू असूनही पांढरकवडा मार्गे हैदराबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात नियमितपणे जनावरांची तस्करी केली जात आहे.
मध्य प्रदेशातून नागपूर, हैदराबाद मार्गे रोज
दिवसभरात २० ते २५ वाहने भरून जनावरे कत्तलीसाठी पाठवली जातात ही जनावरे १० चक्का १२ चक्का, आयशर व बंदिस्त कंटेनरमध्ये कोंबून कत्तलीसाठी पाठविली जातात. पांढरकवडा ठाण्याच्या हद्दीतून वडनेर ते तेलंगणातील बोरजपर्यंत ही वाहने पास करून देण्यासाठी तालुक्यातील गणेश, वासिम, आकाश, अमीर, शकील, शक्ती यांची टोळी वरणा,स्विफ्ट डिझायर, क्रेटा या वाहना पेट्रोलिंग पायलटिंग करून सुरक्षितपणे दररोज पास करतात. त्यासाठी त्यांना दररोजचे लाखो रुपये मिळतात. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील खास चार गाड्यांचे हप्ते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोहोचविले जात असल्याची चर्चा आहे.दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण कोण मदत करतात, याचा तपास केल्यास अनेक जण गळाला लागू शकतात.
जनावराच्या तस्करीची माहिती पोलिसांना मिळाली तरी काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी टोळीतील सदस्यांना याची माहिती देतात. त्यामुळे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ या मार्गाने न येता ते उर्वरित ट्रक इतर मार्गाने वळवून तेलगणात पोहोचवतात. त्याकरिता नागपूर-वडकी-पांढरकवडा- हैदराबाद या मागटिवजी वडकी- राळेगाव-कळंब-रूझा-घाटेजी-पारवा मार्गे हैदराबाद, वडकी-राळेगाव यवतमाळ-महागाव मार्गे हैदराबाद, वडकी-वणी- चारगाव चौकी कोरपना-बेला मार्गे हैदराबाद, वडकी-वणी-चारगाव चाकी- वेळाबाई फाटा-मुकुटबन-दिग्रस फाटा मार्ग हैदराबाद या पाच मार्गाचा जनावर तस्करीसाठी वापर केला जातो.
बऱ्याच वेळा या चोरट्या वाहतु कीवर नियंत्रण आणण्यासाठी सामाजिक कार्यात सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहेत. काही पोलीस अधिकारी व कर्मचारी जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून गोवंशाची सुटका करून गोवंशाला गोरक्षणमध्ये देतात. मात्र तेथूनही हे गोवंश बेपत्ता होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
योगेश पडोळे
प्रतिनिधी पांढरकवडा