अमरावती : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य प्यारे खान यांनी आज पत्रकार परिषद घेत अमरावतीतील घडामोडींवर सविस्तर भाष्य करत राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले. परतवाडा येथे घडलेल्या घटनेनंतर अफवा पसरवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला असून अशा नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
प्यारे खान यांनी सांगितले की, कालच एक पथक परतवाडा येथे पाठविण्यात आले होते. या प्रकरणी अमरावतीचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. मात्र, घटनेनंतर काही राजकीय नेत्यांनी चुकीची माहिती पसरवत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
यासंदर्भात अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, अफवा पसरवणारे नेते कितीही मोठे असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. “नवनीत राणा अमरावतीत असताना त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, “त्यांना दंगली घडवायच्या आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य करत, “हा देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र आहे. विकास थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होईल,” असे स्पष्ट केले.
प्यारे खान यांनी सांगितले की, या संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नवनीत राणा यांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी करणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात धर्माचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत, “हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आले,” असा आरोप केला. तसेच, जर या प्रकरणात पोलिसांनी आरोपींसोबत फोटो काढले असतील तर संबंधितांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने आरोपीचा सामाजिक बहिष्कार करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.









