
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांच्या या भेटीत भारत-इस्रायल संबंधांना नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत असून विशेषतः संरक्षण क्षेत्रात मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संरक्षण सहकार्याचा विस्तार-
भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध मागील काही वर्षांत अधिक दृढ झाले आहेत. आतापर्यंत प्रामुख्याने खरेदी-विक्रीवर आधारित असलेले संरक्षण सहकार्य आता सह-निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली, लेझर आधारित शस्त्रे आणि लांब पल्ल्याच्या प्रगत क्षेपणास्त्रांबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘मिशन सुदर्शन’ला चालना?
भारताने देशासाठी बहुपदरी क्षेपणास्त्र संरक्षण कवच उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प ‘मिशन सुदर्शन’अंतर्गत हाती घेतला आहे. इस्रायलची Israel Aerospace Industries विकसित केलेली ‘एरो’, David’s Sling आणि Iron Dome यांसारखी संरक्षण यंत्रणा जगभरात प्रभावी मानली जाते. या तंत्रज्ञानाच्या आधारे भारत स्वतःची प्रगत अँटी-बॅलिस्टिक प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पावले टाकणार असल्याची चर्चा आहे.
लेझर शस्त्रे व ड्रोन तंत्रज्ञानावर भर-
लेझर-आधारित हवाई संरक्षण प्रणाली हे भविष्यातील युद्धतंत्राचे महत्त्वाचे साधन मानले जाते. कमी खर्चात अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानावर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच अत्याधुनिक ड्रोन प्रणाली आणि नौदलासाठी ‘बराक’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीबाबतही चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. संरक्षण व्यापार येत्या काही वर्षांत अब्जावधी डॉलर्सच्या पातळीवर जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेतान्याहूंचे स्वागतपर विधान-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींच्या दौऱ्याचे स्वागत करताना भारताला उदयोन्मुख महाशक्ती संबोधले आहे. या भेटीत मोदी इस्रायलच्या संसद ‘केनेसेट’ला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संरक्षणाबरोबरच कृषी-तंत्रज्ञान सहकार्य-
या दौऱ्यात संरक्षणाव्यतिरिक्त सूक्ष्म सिंचन, प्रगत कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावरही भर राहणार आहे. दहशतवादविरोधी धोरणात दोन्ही देशांची भूमिका एकसमान असल्याने हा दौरा आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत-इस्रायल मैत्रीचे नवे पर्व सुरू करण्याच्या दृष्टीने हा दौरा निर्णायक मानला जात आहे.








