Published On : Thu, Dec 7th, 2017

विधान परिषदेत प्रसाद लाड विजयी, मुख्यमंत्र्यांनी 14 मतं फोडून सेनेलाही दिला संदेश !

Advertisement

Prasad Lad and CM Fadnavis
मुंबई: विधान परिषद पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची मोजून 14 मतं फोडून आपल्याकडे शिवनेनेच्या पाठिंब्याशिवायही सरकार टिकवण्यासाठी लागणारं पुरेसं संख्याबळ असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या विधानानुसार या सरकारच्या पाठिशी विरोधी आमदारांचे अदृश्यं हात असल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. या पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानं त्यांचा विजय जवळपास निश्चित होताच आणि ते विजयी देखील झाले, त्यांना 209 मतं पडली तर काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्याकडे आघाडीचं 84 चं संख्याबळ असतानाही त्यांना अवघी 73 मतं पडलीत. यावरून काँग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष अशी मिळून 14 मतं फुटल्याचं स्पष्ट होतंय.

निवडणुकीत 2 मतं बाद झालीत. तर एमआयएमच्या 2 आमदारांनी मतदानच केलेलं नाही. त्यामुळे फुटलेली मतं नेमकी कोणाची आहेत याचा शोध विरोधकांना घ्यावा लागणार आहे. तसंच या विजयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडून पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. भाजपने विरोधकांची मोजून 14 मतं फोडल्याने उद्या जरी समजा शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तरी आमचं सरकार या अदृश्य 14 मतांच्या जोरावर स्थिर राहणार आहे. अशाच संदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलाय.

विधानपरिषद संख्याबळ
भाजप-122
शिवसेना-63
कांग्रेस 41
शेकाप -3

बहुजन विकास आघाडी 3
अपक्ष -7
एमआयएम -2
सप-1
रासप-1
मनसे-1
कम्युनिस्ट पक्ष-1

कोण आहेत प्रसाद लाड ?

प्रसाद लाड हे मूळचे उद्योगपती आहेत. या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सध्या ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मुंबै बँकेचे ते संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत असं बोललं जातं. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा शिवसेनेमुळेच निसटता पराभव झाला होता. म्हणून मग त्यांनी यावेळी सर्वात आधी मातोश्रीचा पाठिंबा मिळवला मगच निवडणुकीत उडी घेतली. भाजपनेही राणेंचा पत्ता कट करून लाड यांनाच उमेदवारी दिली. आघाडीच्या काळात त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपदही सांभाळलं असून ते मुंबईत क्रिस्टल सुरक्षा एजन्सी चालवतात.