Published On : Wed, Mar 25th, 2020

देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद;कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार-अजित पवार

Advertisement

मुंबई : – देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभारही मानले आहेत.

राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल असा विश्वास देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये,नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी असं आवाहनही केलं आहे.

अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलच परंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५ ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या ११२ वर पोहोचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.