नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी नवा दावा केला आहे. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भाजप नेत्यांच्या अटकेबाबत माझ्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता,असे ते म्हणाले.सिंग यांनी केलेला दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी खरा ठरविला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला आणि अनेक भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी सुपाऱ्या देण्यात आल्या, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मविआ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी सिल्व्हर ओकवर स्वतः शरद पवारांनी बैठक बोलावली होती. तर, मातोश्रीवरही बैठक घेण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी केला होता. याला आता फडणवीसांनी दुजोरा दिला परमबीर सिंग यांनी मला आणि भाजप नेत्यांना अटक करण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य सत्य आहे. त्यांनी फक्त एकच घटना सांगितली. पण अशा चार घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये खोट्या केसेस लावून मला अटक करण्याचं षडयंत्र झाले. परंतू, या सगळ्या षडयंत्रांचा आम्ही पर्दाफाश केला आणि त्याचे पुरावेदेखील सीबीआयला दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला, गिरीष महाजन, प्रविण दरेकर अशा अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी काही अधिकाऱ्यांना दिली होती. परंतू, ते हे करु शकले नाहीत. कारण अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी त्या त्या वेळी अशा प्रकारच्या खोट्या केसेस करण्यास नकार दिला होता, असे फडणवीस म्हणाले