Published On : Wed, Feb 26th, 2020

– अन्‌ महापौरांनी वाहन थांबवून केली वाहतूक नियमांची जनजागृती

Advertisement

नागपूर : वाहतूक नियमांची शिस्त लावल्यास आपल्याच नाही तर रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला फायदा आहे. वाहतूक नियमांचे पालन म्हणजे अपघातमुक्ती असा मंत्र देत महापौर संदीप जोशी यांनी लॉ कॉलेज चौकात स्वत: वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.

नागपूर शहरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या जनआक्रोश संस्थेतर्फे प्रत्येक बुधवारी शहरातील कुठल्यातरी चौकात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येते. बुधवारी (ता. २६) जनआक्रोशतर्फे लॉ कॉलेज चौकात जनजागृती अभियान सुरू होते. दरम्यान, त्या भागातून महापौर संदीप जोशी जात होते. त्यांनी जनआक्रोशच्या सदस्यांना बघून गाडी थांबविली आणि ते गाडीतून उतरले. जनआक्रोशच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी स्वत: जनजागृती मोहिमेत भाग घेतला.

महापौरांनी जनआक्रोशच्या सदस्यांसोबत चौकात उभे राहून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत सांगितले. नागपूर शहर अपघातमुक्त व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक पोलिस विभाग आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. ‘मम्मी पापा मी टू’ अभियानाच्या माध्यमातूनही वाहतूक नियमांबाबत नागरिकांना जागरुक करण्यात आले होते. वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक वाहनचालकांची आहे. त्यामुळे स्वत: नियमांचे पालन करून वाहने चालवा आणि इतरांनाही त्याबाबत सांगा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

यावेळी जनआक्रोशच्या सदस्यांसह वाहतूक पोलिस आणि नागरिक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते.