
नागपूर : राज्यात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारत सायबर गुन्हे रोखण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे २,००० कोटी रुपयांचा नेमका उपयोग कुठे झाला, असा थेट सवाल केला. सायबर फसवणुकीतून लुटलेल्या पैशांची रिकव्हरी केवळ २ टक्के इतकीच असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.
मुंबईत सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, राज्यात दररोज हजारो नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मात्र फसवलेल्या पैशांची परतफेड अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने जर २,००० कोटी रुपयांचा खर्च केला असेल, तर त्याचे ठोस परिणाम जनतेला का दिसत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी राज्यातील नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दर महिन्याला सुमारे २१ कोटी संदेश पाठविण्याचे तसेच जनजागृती मोहिमेसाठी ३४ कोटी रुपये खर्च करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, ठाकरे यांनी स्पष्ट केले की केवळ ‘गोल्डन अवर’च्या घोषणांनी समस्या सुटणार नाही. नागरिकांची फसवणूक होण्यापूर्वीच रिअल-टाइम अलर्ट प्रणाली, जलद तपास यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत त्वरीत पोहोचणारी प्रभावी व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे.
“जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवणे ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे,” असे सांगत सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.








