
मुंबई : सतत घसरत असलेल्या कांद्याच्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देताना राज्यात आजपासून 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. “कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याबाबत मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात 12.35 रुपये दराने कांदा खरेदीला सुरुवात होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी यावेळी ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांच्या अडचणीही राज्य सरकार दूर करेल, अशी ग्वाही दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे, त्यांनाही शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनीही शेतकऱ्यांना दिलासा देणारे वक्तव्य केले. “देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि गरीबांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात घरकुलांचा लाभ मिळाला असून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, उन्हाळी कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 600 ते 700 रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. काही ठिकाणी प्रतिक्विंटल 1500 रुपयांपर्यंत तोटा होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








