
नागपूर -महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदलाची नांदी झाली आहे. इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दिला असून येत्या जूनपासून तो अंमलात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याआधी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना हा सुधारित आराखडा अनुभवायला मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बदल-
राज्य सरकारने अभ्यासक्रमाची रचना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लक्षात घेऊन केली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर भर देत विषयांची काठिण्यपातळी निश्चित करण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेत अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पाठ्यपुस्तक निर्मितीला गती दिली जाणार आहे.
बालभारतीकडून नवीन पाठ्यपुस्तके-
नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारती वर सोपवण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपर्यंत ही पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार विद्यार्थ्यांना अधिक समजून घेता येईल, अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
शिक्षकांसाठी प्रशिक्षणावर भर-
नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. SCERT मार्फत राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार असून त्यानंतर जिल्हास्तरावरही कार्यशाळा घेतल्या जातील.
या सर्व बदलांमुळे राज्यातील शिक्षणपद्धती अधिक आधुनिक, कौशल्याधारित आणि विद्यार्थीकेंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








