नागपूर: काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे राजकीय पुनर्वसन होणार आहे. मंगळवारी नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे आणि नारायण राणे दोघांचा अनुभव पक्षासाठी महत्वाचा असल्याचे सांगत त्यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
नारायण राणे यांनी दोन आठवडयांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना कोल्हापूरमध्ये आपण लवकरच मंत्री बनू असे म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही तसेच संकेत दिल्याने राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे तसेच सध्या सरकारबाहेर असल्याने अस्वस्थ असलेल्या एकनाथ खडसे यांच्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण विधान केले. यासोबतच एकनाथ खडसेबद्दल ते म्हणाले की, पुर्नवसन विस्थापितांचे होते, खडसे तर प्रस्थापित नेते आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ खडसे सध्या आपल्याच सरकारला घरचा आहेर देत आहेत. खडसे यांनी सोमवारी प्रत्येक मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. चार वर्षांपासून एकच ऐकतोय, जे शक्य आहे, तेच सांगा. हे काय सरकार आहे का? अशा शब्दांत त्यांनी विविध मंत्र्यांना धारेवर धरीत सरकारचे कान टोचले. खडसे यांच्या प्रश्नांनी सरकर अडचणीत येत असल्याने विरोधकांनीही त्यांना साथ दिली.


