
नागपूर : हनुमान जयंतीच्या उत्साहात न्हालेलं शहर क्षणात सुन्न झालं, जेव्हा १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या अपहरणानंतर त्याची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं. गिट्टीखदान परिसरातील या थरारक गुन्ह्याने नागपूर हादरलं असून, खंडणी उकळण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.या प्रकरणात जयराम गोपाल यादव (19, निवासी आईबीएम रोड, गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (22, निवासी कुतुबशाह मस्जिद के पास, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (19, निवासी शिवशंकर मंदिर, मानकापुर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, हे तिघेही पीडित कुटुंबाच्या ओळखीचेच निघाले.
रोजच्या व्यवहारातून घराची आर्थिक स्थिती ओळखून त्यांनी पैशाच्या लालसेपोटी थेट अपहरणाचा प्लॅन आखला.घटनेच्या दिवशी शोभायात्रेची गर्दी आणि गोंधळ याचा फायदा घेत अथर्वला गाठण्यात आलं. “आईस्क्रीम घेऊन येतो” असं सांगून बाहेर पडलेल्या अथर्वला जयरामने फूस लावून टाटा एस गाडीपर्यंत आणलं. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या इतर दोघांनी त्याला जबरदस्तीने गाडीत ढकललं. किंकाळ्या दाबण्यासाठी तोंड बांधलं… आणि काही क्षणांतच त्याचं आयुष्य काळोखात ढकललं गेलं.
गोरेवाड्याकडे नेत असताना परिसरात वाढलेल्या खळबळीमुळे आरोपी घाबरले… आणि त्याच भीतीत त्यांनी गाडीतच कपड्याने गळा आवळून अथर्वचा जीव घेतला.
एका निष्पाप जीवाचा शेवट इतक्या थंड डोक्याने करण्यात आला.हत्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी मृतदेह कळमेश्वर फ्लायओव्हरजवळ फेकून दिला, तर वाहन धुवून सगळे आपल्या घरी परतले जणू काही घडलंच नाही अशा थाटात. मात्र, पोलिसांच्या बारकाईतून काहीही सुटलं नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद टाटा एस दिसताच तपासाची दिशा बदलली.
आयुषला ताब्यात घेताच संपूर्ण कट उघडकीस आला आणि काही तासांतच तिघांनाही अटक करण्यात आली.गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने या खळबळजनक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असला, तरी या घटनेने नागपूरकरांच्या मनात भीतीचं सावट निर्माण केलं आहे. निष्पाप अथर्वच्या हत्येने शहर सुन्न झालं असून संतापाची लाट उसळली आहे.








