
नागपूर :बहुप्रतिक्षित नागपूर महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना उत्तर नागपूरमधील प्रभाग क्रमांक २ पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सामाजिक रचना, पक्षीय ताकद आणि वर्षानुवर्षे प्रलंबित नागरी प्रश्न यांचा मेळ या प्रभागातील निवडणूक लढतीला अधिकच निर्णायक बनवत आहे.
या प्रभागात अनुसूचित जातींचे सुमारे ५२ टक्के वर्चस्व असून, त्यामुळे जातीय आणि सामाजिक समीकरणे निकालात महत्त्वाची भूमिका बजावतात. परिणामी, उमेदवारांची निवड आणि प्रचाराची दिशा याच घटकांभोवती फिरताना दिसते.
बसपचा किल्ला ते काँग्रेसचे वर्चस्व-
एकेकाळी बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा प्रभाग गेल्या दशकात मोठ्या राजकीय बदलांचा साक्षीदार ठरला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने चारही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भावना लोणारे, दिनेश यादव, नेहा निकोसे आणि मनोज संगोले हे काँग्रेसचे उमेदवार विजयी ठरले होते.
नंतर मनोज संगोले यांनी बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक बसपच्या तिकिटावर लढवली; मात्र त्याचा काँग्रेसच्या मूळ मतदाराधारावर फारसा परिणाम झाला नाही. प्रभाग क्रमांक २ हा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात मोडतो आणि सध्या येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. नितीन राऊत प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या प्रभावामुळे काँग्रेसची पकड आजही मजबूत मानली जाते.
इच्छुकांची गर्दी, राजकीय गणिते अनिश्चित-
यंदा काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या. दुसरीकडे, बसप परंपरेप्रमाणे उमेदवारांची घोषणा शेवटच्या टप्प्यात करून प्रतिस्पर्ध्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची रणनीती अवलंबण्याची शक्यता आहे. मनोज संगोले पुन्हा मैदानात उतरणार का, आणि कोणत्या पक्षातून, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, अलीकडील निवडणुकांतील कामगिरीच्या जोरावर भाजपही या प्रभागात आक्रमक तयारी करत असल्याचे संकेत आहेत. लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व कायम राहणार की त्याला आव्हान मिळणार, हे निकालच ठरवतील.
नागरी समस्या : दुर्लक्ष कायम-
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी प्रभाग क्रमांक २ नागरी समस्यांनी अक्षरशः ग्रासलेला आहे. सीमाभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वसाहती असून त्या आजही नियोजनबद्ध विकासाच्या बाहेर आहेत.
पिली नदीकाठच्या वस्त्यांमध्ये निचऱ्याची दीर्घकालीन समस्या असून, पावसाळ्यात सांडपाणी तुंबणे हे नेहमीचेच झाले आहे. नागरिकांचा आरोप आहे की नागपूर सुधार प्राधिकरणाने (NIT) नियमितीकरण शुल्क वर्षांपूर्वी घेतले; मात्र मूलभूत सुविधा देण्यात अपयश आले आहे.
नागनदी कारखान्याजवळील झोपडपट्ट्यांतील विस्थापितांचे पुनर्वसन दहा वर्षांपूर्वी झाले असले, तरी आजही रस्ते, पाणीपुरवठा आणि गटारव्यवस्था अपुरीच आहे. अनेक भागांत नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
उप्पलवाडी जमीन, नवीन म्हाडा वसाहत तसेच SRA घरांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. भदंत आनंद कौसल्यायनगर, पिली नदी बस्ती, तक्षशिला नगर यांसारख्या झोपडपट्ट्या आजही खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
यासोबतच उघड्यावर कचरा साठवण, उद्याने व खेळाच्या मैदानांकडे दुर्लक्ष, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि स्वच्छतेचा अभाव या समस्या प्रभागवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत.
प्रभागातील प्रमुख भाग-
नारी गाव, सुगत नगर, कबीर नगर, पिली नदी वस्ती, उप्पलवाडी, बाबा दीपसिंग नगर, हमाल नगर, पॉवरग्रीड, WCL रेस्क्यू स्टेशन, नालंदा नगर, संजय नगर, कपिल नगर, प्रभात कॉलनी, नागपूर (ग्रामीण) मुख्यालय, ठाकरे कॉलनी, नवी ठाकरे कॉलनी, मिसाळ लेआउट, कामगार नगर, MIG/HIG कॉलनी, तेग बहादूर नगर, आहुजा नगर, लाल गोदाम, कस्तुरबा नगर, वडपाखड (भाग), टेकानाका (खडग) आदी भागांचा या प्रभागात समावेश होतो.
दरम्यान सामाजिक रचना, तीव्र राजकीय स्पर्धा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित नागरी प्रश्न यांचा संगम प्रभाग क्रमांक २ मधील निवडणूक रणधुमाळी अधिकच रंगतदार करणार आहे. मतदार विकासाला प्राधान्य देणार की पारंपरिक राजकीय समीकरणांना, याकडे संपूर्ण उत्तर नागपूरचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक २ : चारही उपप्रभागातील उमेदवारांची यादी-
नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ (अ, व, क, ड) मध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी (दोन्ही गट), वंचित आघाडी, आप, शिवसेना (उबाठा) यांच्यासह विविध प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणूक लढत बहुरंगी ठरण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून डॉ. सरिता माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे आणि पंकज यादव मैदानात आहेत. काँग्रेसने भावना लोणारे, दिनेश यादव, संगीता पाटील आणि मनीष बनसोड यांना संधी दिली आहे.बसपाकडून प्रीती बोदेले, वर्षा सहारे, महेश माने आणि उमेश मेश्राम, तर राष्ट्रवादीकडून गोपाल यादव, सीमा आवळे, मनोज सांगोळे उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी (शप) गटाकडून वर्षा शामकुळे, शुभम पडोळे, अकबर सय्यद आणि प्रिया पाली, आपकडून सूचना गजभिये व विशाल वैद्य, वंचित आघाडीकडून नीलिमा गजभिये व गौतम शेंडे रिंगणात आहेत. शिवसेना (उबाठा) कडून देवराज वासनिक, तर विविध प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रंगत वाढवली आहे.








