
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर आगामी निवडणुकीची तयारी सुरु असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपा उडाली आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विकास ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत मनपा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा दावा केला.
“चार प्रभाग असतानाही काँग्रेसने ताकदीने लढा दिला होता. मात्र, नागपूरमध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या बाबतीत अपेक्षित काम झालेले नाही. त्यामुळे नागपूरकर यंदा भाजपला स्पष्ट नकार देतील,” असे ठाकरे म्हणाले.
भाजपचे १२० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार –
दुसरीकडे भाजप नेते संदीप जोशी यांनी काँग्रेसच्या दाव्यांना फाटा देत भाजपला पुन्हा बहुमत मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. “भाजप नेहमीच निवडणूक मोडमध्ये असते. यंदाही नागपूर महापालिकेवर भाजपचेच वर्चस्व राहील. आम्ही १२० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू,असा दावा त्यांनी केला.
जोशी पुढे म्हणाले, नागपूरकरांनी मागील तीन टर्ममध्ये भाजपवर विश्वास दाखवला आहे. आता चौथ्यांदा देखील तोच विश्वास पुन्हा मिळेल. महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग रचना, उमेदवारी, विकासकामे आणि नागरिकांचा मूड यावरच अंतिम निकाल ठरणार आहे.