Published On : Thu, Feb 15th, 2018

महावितरणने वर्षभरात ४३ हजार मीटर्स बदलले ३३ हजार नवीन जोडण्या दिल्या

Advertisement

नागपूर: महावितरण कडून वीज ग्राहकांना वापरलेल्या विजेचे अचूक देयक मिळावे यासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलात येणाऱ्या वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सुमारे ४३ हजार मीटर्स बदलण्यात आले आहेत.

वीज मीटर वरील डिस्पले दिसत नाही,वीज मीटर वेगाने फिरते अशा तक्रारी वीज ग्राहकांनी महावितरण प्रशासनाकडे केल्यावर मुख्य कार्यालयाकडे नवीन वीज मीटरची मागणी केली होती. मुख्य कार्यालयाने देखील टप्याटप्याने नागपूर परिमंडल कार्यालयास वीज मीटर उपलब्ध करून दिले. यामुळे दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज मीटर बदलण्याच्या मोहिमेला गती मिळाली. या मोहिमेत नागपूर ग्रामीण मंडल कार्यालय येणाऱ्या ग्रामीण भागात १५,९६४ वीज मीटर्स बदलण्यात आले. वर्धा जिल्ह्यात १५,६९५ तर नागपूर शहरात ११,२१६ वीज मीटर्स बदलण्यात आले. काही वीज ग्राहकांनी वीज मीटर्समध्ये छेडछाड केल्याची बाब भरारी पथकास निदर्शनास आली होती. अशा वीज ग्राहकांचे वीज मीटर्स देखील यात बदलण्यात आले आहेत. सदर वीज मीटर्स हे घरगुती आणि वाणिज्य श्रेणीतील वीज ग्राहकांचे असून यात कृषी आणि औदयोगिक श्रेणीतील वीज ग्राहकांचा समावेश केलेला नाही.

महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात २०७१, बुटीबोरी विभागात ४८९३, वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात २५६२, हिंगणघाट विभागात २१५७, वर्धा विभागात ४२७५, नागपूर ग्रामीण मधील मौदा विभागात ५७८२, काटोल विभागात २०८३, सावनेर विभागात २९९४ आणि नागपूर ग्रामीण विभागात सर्वाधिक ६८१० वीज मीटर्स बदलण्यात आले.

एप्रिल-२०१७ ते जानेवारी-२०१८ या कालावधीत नागपूर परिमंडल कार्यालयास एकूण ८७,७८७ वीज मीटर्स मुख्य कार्याकायाकडून उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी नादुरुस वीज मीटर्स बदलण्यासोबतच मोठ्या प्रमाणात घरगुती आणि वाणिज्य श्रेणीतील नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या वीज ग्राहकांना जोडणी देणे शक्य झाले. महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात सर्वाधिक ६२२४, बुटीबोरी विभागात ४९९२, वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात ४८३९, हिंगणघाट विभागात ४१३४, वर्धा विभागात ६७२२, नागपूर ग्रामीण मधील मौदा विभागात४७५९, काटोल विभागात ३०१०, सावनेर विभागात २९३४ आणि नागपूर ग्रामीण विभागात ५२६१ नवीन वीज जोडण्या देणे शक्य झाले. नादुरुस्त वीज मीटर्स बदलून झाल्यावर आणि नवीन ग्राहकांना वीज जोडणी दिल्यावर मोठ्या प्रमाणात वीज मीटर्सचा साठा महावितरणकडे शिल्लक असून यातून नवीन ग्राहकांना जोडणी देणे आणि नादुरुस्त मीटर्स बदलण्याची मोहीम सुरु असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.