नागपूर: सन 2014 नंतर विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्य शासनाने 30 हजार कोटी रुपये राज्याला दिले. या निधीतून बंद असलेल्या सर्व प्रकल्पाची कामे सुरु झाली आहेत. आज विदर्भात एकही प्रकल्प निधीमुळे रखडला अशी स्थिती नाही. येत्य 2 वर्षात विदर्भाचा सिंचनाचा अनुशेषही पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मौदा येथे स्वागत सभेत दिले.
मौदा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असे या स्वागताचे वर्णन करावे लागणार आहे. याप्रसंगी रथावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.
विदर्भ मराठवाड्याच्या शेतकर्यांच्या कृषी पंपाचा बॅकलॉग संपला. पूर्वीचे सरकार वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कापत होते. आपल्या सरकारने मात्र 30 हजार कोटींची थकबाकी शेतकर्यांकडे असताना एकही कनेक्शन कापले नाही. शेतकर्यांच्या खात्यात आतापर्यंत विविध योजनांचे मिळून सरकारने 50 हजार कोटी रुपये जमा केले आहे. एवढी मदत शेतकर्याला आजपर्यंत कोणत्याच सरकारने केली नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
राज्याच्या ग्रामीण भागात 30 हजार किमीचे रस्ते मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेतून केले. 20 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले आणि 10 हजार किमीचे रस्ते राज्य शासनाने बांधले. 50 हजार किमीचे रस्ते 5 वर्षात बांधणारे महाराष्ट्र शासन एकमेव आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले- पाच वर्षात आम्ही आमच्यासाठी काही केले नाही. संपत्ती तयार केली नाही, शाळा कॉलेज आणले नाही म्हणूनच भ्रष्टाचाराचा एक डागही आमच्यावर नाही. यावेळीही या सरकारला तुमचा आशीर्वाद पाहिजे. बोला द्याल ना भाजपाला जनादेश असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच नागरिकांनी मोठ्या आवाजात हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.
ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौद्यात एकत्र आलेल्या जनसागराचे हात उंचावून व हात जोडून आभार मानले.
या कार्यक्रमाला श्री श्री फाऊंडेशनचे संकेत बावनकुळे, मौद्याच्या नगराध्यक्ष भारती सोमनाथे, राजू सोमनाथे, सदानंद निमकर, टेकचंद सावरकर, मनीष वाजपेयी, योगेश वाडीभस्मे, अजय बोढारे, नरेश मोटघरे, अनिल निधान, मनोज चवरे, मुन्ना चलसानी, मुकेश अग्रवाल, देवराव कुंभलकर, श्रीमती पोटभरे, ईश्वर भागलकर, कैलास बरबटे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष नरेश भोयर, विवेक मंगतानी, शहर अध्यक्ष सुनील रोडे, हेमराज सावरकर, चांगोजी तिजारे, रामकृष्ण वंजारी आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
-मुख्यमंत्र्यांनी रथावरून नागरिकांना संबोधित केले.
-पालकमंत्री बावनकुळे यांनी हात उंचावून व हात जोडून नागरिकांना अभिवादन केले
-मौद्यातील या स्वागताच्या कार्यक्रमाला जवळच्या लहान गावातून रॅलीने लोक येत होते.
-कामठीतूनही भाजपाचे झेंडे हातात घेऊन रॅलीने कार्यकर्ते आले.
-कार्यक्रमस्थळी असलेल्या आजूबाजूच्या इमारतींवर हजारो लोकांची गर्दी झाली होती.
-सुरुवातीला फ्लॅशबँक क्लबच्या तरुण तरुणींनी नृत्य सादर केले.
-राजमाता ढोल ताशा ग्रूपच्या तरुणांनी ढोल ताशांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली
-प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांनी हातातील मोठे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
-संपूर्ण मौदा शहर आज भगवे झाले होते. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी कमळाच्या टोप्या घातल्या होत्या.
-प्रेक्षकांसमोर मोठा डिजिटल स्क्रीन लावला होता. त्यावर शासनाच्या उपलब्धी दाखविल्या जात होत्या.
-यापूर्वी मौद्यातील या चौकाने कधीही एवढी गर्दी अनुभवली नसल्याची चर्चा होती.