Published On : Mon, Mar 11th, 2019

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : मनपा आयुक्त अभिजीत बांगर

Advertisement

नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी (ता. ११) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी, विभागप्रमुख व सहायक आयुक्त उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आचारसंहितेसंदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. या काळात कुठल्या नवीन निविदा सूचना निघणार नाहीत. जुने कार्यादेश झालेली जी कामे सुरू आहेत, ती सुरू राहतील. देखभालीची कामे सुरू राहतील. पाणीपुरवठा आणि आरोग्य ह्या बाबी अत्यावश्यक सुविधेत मोडत असून त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिलेत.

संपूर्ण शहरात मनपाच्या जागांवर किंवा मनपा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकीय बॅनर्स, होर्डिंग्स लागले असतील तर ते तातडीने काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. जेथे-जेथे राजकीय व्यक्तींची नावे असलेली फलके आहेत, ते तातडीने काढावेत, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे हे सर्व सुविधांनी युक्त असायला हवे. दिव्यांगांसाठी रॅम्प, पाणी आदी सुविधा तेथे असायला हव्यात. यासंदर्भात संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांनी तातडीने केंद्रांची पाहणी करून अहवाल सोपविण्याचे निर्देश त्यांनी दिले.