
नागपूर, ः राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूर शहराचा विकास करण्यासाठी तसेच २०४७ मध्ये विकसित नागपूर साकार करण्यासाठी महत्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. यामुळे नागपूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांच्या विकासाला केंद्रबिंदू मानून योजना तयार केल्या आहेत. यामुळे राज्याच्या विकासाला निश्चितपणे नवे परिमाण लाभणार आहे. नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नागपूरसाठी नव्या रिंगरोडला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या आर्थिक वाढीसाठी नवे नागपूर वसविण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे धर्तीवर नागपूरला सुद्धा ग्रोथ हब विकसित करण्यासाठी नीती आयोग रोड मॅप तयार करणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपुरात स्थापन केली जाणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी या संस्थेचा फायदा होणार आहे. नागपूर येथे डीजीटल युगामध्ये डाटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा नागपूरच्या आयटी सेक्टरला नवी संधी उपलब्ध करून देणारी आहे.
महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा महिलांसाठी विशेषत्वाने महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे राज्यातील २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दीष्टाची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. याशिवाय विद्यार्थीनीसाठी वसतिगृहे, एकल महिला सक्षमीकरण योजना, महिला बचत गटासाठी जिल्हा विक्री केंद्रांची स्थापन करण्याची घोषणा महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरणार असल्याचेही त्यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.








