नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यानंतर ४० दिवसांत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होतं.त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचे ठरवले आहे. अंतरवाली सराटी येथील जाहीरसभेतून जरांगे यांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दहा दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल मराठा समाजाची नसेल. २२ ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला पुढचे आंदोलन कसे असेल, यासंदर्भात माहिती देण्यात येईल.
मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय तुमचा हा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही. फक्त सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. मग सरकार आरक्षण कसं देत नाही, हे मराठे बघतील. याची काळजी करू नका, असे मनोज जरांगे पाटील सभेत म्हणाले.
मी पुन्हा एकदा शब्द देतो, २९ ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्याच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघेल. हेच मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. २३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघणार, असे रोखठोक विधान जरांगे यांनी सभेत केले.