Published On : Mon, May 29th, 2017

रविवारच्या वादळात महावितरणचे मोठे नुकसान; तत्परतेने विजपुरवठा बहाल

Advertisement

File Pic

नागपूर: रविवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास शहरात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने महावितरणच्या कॉग्रेसनगर आणि बुटीबोरी विभागात उच्चदाब वीज वाहीनीचे 15 तर लघुदाब वीज वाहिनीचे 54 असे एकूण 69 वीजखांब जमीनदोस्त झाले. यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता, मात्र महावितरण अधिकारी आणि कर्मचा-यांनी युद्धपातळीवर काम करीत सुमारे 40 टक्के भागातील वीजपुरवठा अवघ्या अर्ध्या तासात पुर्ववत केला तर रात्री 9 पर्यंत प्रभावीत भागापैकी 90 टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून उर्वरीत भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरु करण्यात आला.

या वादळामुळे 69 वीजखांबांसोबतच 8.11 किमी लांबीची वीज वाहिनी क्षतीग्रस्त झाली त्र 11 वितरण रोहीत्रे नादुरुस्त झाली असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनेक अडचणी होत्या, त्यातच अनेक वीजतारांमध्ये झाडाच्या फ़ांद्या आणि जाहीरातींचे फ़्लेक्स बोर्ड्स तारांमध्ये अडकल्याने दुरुस्तीच्या कामात वारंवार व्यत्यय येत असतांनाही महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी संपूर्ण रात्रीचा दिवस करीत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळविले. यात महत्वाचे मह्णजे महावितरणने योग्यरित्या मान्सूमपुर्व तयारी केल्याने एवढ्या प्रचंड वादळातही महावितरणच्या कुठल्याही उपकेंद्रात बिघाड झाला नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास व्यत्यय आला नाही.

ग्राहकांना आवाहन –

आपल्या भागातील वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी अनेक ग्राहक महावितरणच्या अभियंत्यांना वारंवार फ़ोन करीत असल्याने अनेक महत्वाच्या सुचना दुरुस्तीकामावर असलेल्या कर्मचा-यांना फ़ोनवरुन देण्यात अडचणी येत होत्या. महावितरणने ग्राहकांसाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲप वरुनही वीज बंद असल्याची तक्रार नोंदविता येत असल्याने ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, तसेच खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.