Published On : Thu, May 31st, 2018

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

Advertisement

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते.

हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. के जे सोमय्या रुग्णालयात पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

पहाटे चार वाजता उलटी

अस्वस्थ होत असल्याने पांडुरंग फुंडकर पहाटे चार वाजता उठले. त्यानंतर त्यांना उलटी झाल्याने, त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवलं. त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीच त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्यांना हार्टअटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.

फुंडकरांच्या अकाली निधनाने धक्का

पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला. फुंडकर हे काही आजारी नव्हते. मात्र हृदयविकाराने त्यांना अवचित गाठल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा चेहरा हरपला आहे.

महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला.

ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असल्याचा नेता म्हणून फुंडकर परिचीत होते.

फुंडकर यांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं. महाराष्ट्रात भाजपचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून भाजप वाढवण्यासाठी ज्या काही नेत्यांनी काम केलं, त्यापैकी एक म्हणजे पांडुरंग फुंडकर होय.

ते बुलडाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होते. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार होते.

पांडुरंग फुंडकर यांचा परिचय

पांडुरंग पुंडलिक फुंडकर म्हणजेच भाऊसाहेब फुंडकर यांचा जन्म 1950 मध्ये बुलडाण्यातील खामगावमध्ये झाला.

फुंडकर पहिल्यांदा 1978 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. 1985 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

त्यांनी महाराष्ट्र भाजपचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

1991 ते 96 या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं

फुंडकरांनी विधानपरिषदेतील विरोधपक्षनेतेही होते.

सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांनी दिल्लीत केलं.

फुंडकर भाजपचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर 1978 आणि 1980 मध्ये फुंडकर खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

8 जुलै 2016 रोजी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली होती.