तरुणांनो, नवीन गोष्टीत मन रमवा…प्रॉडक्टीव्ह… इनोव्हेटिव्ह गोष्टी करा…
इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी तरुणांशी साधला संवाद…
मुंबई : महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे, आपण या संकटातून पुन्हा उभारी घेऊच असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तरुणांमध्ये निर्माण केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज आगळावेगळा प्रयत्न करत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला.
यावेळी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात नवीन गोष्टीत मन रमवा, प्रॉडक्टीव्ह, इनोव्हेटिव्ह गोष्टी करा असा सल्ला जयंत पाटील यांनी तरुणांना दिला.
या चर्चासत्रात जयंत पाटील यांनी तरुणांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच त्यांच्या प्रश्नांची यावेळी उत्तरेही दिली.
राजस्थानच्या कोटा येथे महाराष्ट्रातले विद्यार्थी अडकले आहेत, लव्हली युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी अडकले, इतरही ठिकाणी असेच तरुण अडकले आहेत यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार नक्कीच प्रयत्न करणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे त्यासाठी काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी सरकार देत आहे. शेतकऱ्यांना आधीच काही सवलती दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच आपण पूर्वपदावर येऊ असा विश्वासही जयंत पाटील यांनी तरुणांना दिला.
फेक अकाउंटवरून अफवा पसरवल्या जात असल्याची तक्रार काही तरुणांनी या संवादात केली. अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
या संवादादरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत प्रश्न विचारले, काहींनी परीक्षा रद्द करण्याच्या सुचना दिल्या मात्र लॉकडाऊनच्या काळात परीक्षेची जोरदार तयारी करा. वेळेचा सदुपयोग करा, परीक्षा कधीही झाली तरी तुम्ही तयार रहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.