मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे नेतेही कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर अजित पवार शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना सावध करत आहेत. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन कामे होत नाहीत, असे अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्यावा. गावात दोन गट आहेत, ज्याचा निवडून येईल त्याला मदत करा. आम्ही कोणाचा पक्ष चोरला नाही हे सांगा. संसदेत भाषण करून प्रश्न सुटत नाहीत हे सांगा. २००४ ला मुख्यमंत्री पदाची संधी होती. परंतु संधी घेतली नाही. मी मुख्यमंत्री पदाला हपापलेलो नाही, असेही अजित पवार म्हणाले.