Published On : Fri, Jul 8th, 2022

चला, नागपूर ड्रग्जमुक्त करु या! – पंडित

Advertisement

– अमली पदार्थावरील ‘वेब चर्चेत ‘ आवाहन

नागपूर: अमली पदार्थाचा विळख्यात तरुणाई गोवल्या गेली आहे. ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचे सेवन,वाहतूक, विक्री आदी व्यवसायात तरुण मुलांसोबत मुलीसुध्दा अडकल्या आहेत. महानगरासोबत ग्रामीण भागात सुध्दा हा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून पोलिसांसोबत हातभार लावूया, चला नागपूर ड्रग्जमुक्त करु या ! असे आवाहन नागपूरचे पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित यांनी आज वेब चर्चेत केले.

तरुणाईसमोर भेडसावणारी एकमेव समस्या अमली पदार्थ असून त्याबाबत पोलीस प्रशासनाद्वारे उपाययोजना करण्यात करण्यात येत आहेत. याबाबत राज्य व जिल्हास्तरीय समिती सुध्दा गठित करण्यात आली असून यात पोलीस विभागासह महसूल, वन, सिमा सुरक्षा, राज्य उत्पादन, पोस्ट विभाग व अन्न व औषध विभागाचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर यांची ‘अंमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही’ या विषयावर विशेष संवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी श्री. पंडित यांचे स्वागत केले.

विविध अमली पदार्थ सेवन, बाळगणे, वाहतूक करणे आदी बाबत वेगवेगळे नियमानूसार कारवाई करण्यात आली असून समस्यांचे निराकरणासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. याबाबत सर्वदूर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

इंटरनेट प्रमाणेच डार्कनेटद्वारे अंमली पदार्थाची वाहतूक पोस्टाच्या माध्यमातून होतांना आढळून आले. त्यामुळे पोस्ट विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. याबाबत सायबर सेलद्वारे सोशल मिडीयाची चौकशी करण्यात येत आहे. तरुण मुलांमुली सोबतच शाळकरी मुले सुध्दा यात आढळले आहे. या मुलांना प्रलोभनाद्वारे प्रोत्साहित करुन आपल्या जाळयात अडकविण्यात येते. खुळया कल्पनाद्वारे प्रोत्साहनाला बळी पडून आपसूक ओढावतात व सवयीचे रुपांतर व्यसनात होते. याच व्यसनाधिनतेमुळे मुली पैशाच्या चणचणीमुळे वेश्या व्यवसायाकडे वळतात. नंतर त्यांची मानसिक व शारीरीक परिस्थिती भयावह होते. त्यामुळे पालकांनी सुध्दा सावध राहणे गरजेचे असून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

यासर्व बाबीचा परिणाम समाजावर निश्चित होते. तसेच व्यसनाधिनतेमुळे एडस् व अनेक आजारांना ते बळी पडतात. नैराश्यामुळे त्यांच्या वागण्यात फरक पडतो. चिडचिडेपणा, भांडण यासोबतच घातक परिणाम म्हणजे गुन्हेगार सुध्दा बनतात, असे निदर्शनात आले आहे. यावर उपाय म्हणून एनडीपीएस कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत 1 ते 10 वर्षापर्यंत संबंधितास शिक्षा होऊ शकते, असे ते म्हणाले.

या वेबचर्चेत दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी यांनी सुध्दा सहभाग नोंदवून शहरातील अंमली पदार्थांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केला. नागपूर शहरात जवळपास 800 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विक्री होऊ शकते अशा ठिकाणी पोलीस कायम पाळत ठेवून असून नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. शहरात या संदर्भात होणाऱ्या कारवाईचे प्रमाण वाढले असून शहर अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र यासाठी सामान्य नागरिकांनी जागरूकपणे पोलिसांचे कान, नाक, डोळे होणे आवश्यक आहे. सोबतच आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे यासाठी सर्व स्तरावर सकारात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.