Published On : Sat, Apr 4th, 2020

पंतप्रधान मोदींच्या आत्मिक आवाहनाला साद द्या : चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

विजेच्या 10 मिनिटाच्या बॅकडॉउनने ग्रीडवर परिणाम होणार नाही

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील विजेचे दिवे बंद करून पणत्या, टॉर्च, मेणबत्ती, लावण्याच्या आत्मिक आवाहनाला देशातील सर्व नागरिकांनी साद द्यावी. 10 मिनिटे लाईट बंद ठेवल्याने नॅशनल ग्रीडवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याचा अभ्यास तांत्रिक अधिकारी करीत आहे, असे आवाहन वजा प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांच्या या आवाहनाबद्दल बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहे. कोरोनासारख्या महामारी विरुद्ध लढण्यास आपण 130 कोटी भारतीय एकत्र आहोत. कुणीही एकटे नाही हेच या उपक्रमातून पंतप्रधानांन सांगायचे आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले- संपूर्ण देशाने या आवाहनाचे पालन करावे. वीज यंत्रणेवर ताण येईल असे तांत्रिक प्रश्न निर्माण करण्यात आले. पण देशात यापूर्वी 15 हजार मेगावाट विजेचे बॅकडाऊन झाले आहे. राज्यातही 2500 मेगावाट चे बॅक डाऊन झाले आहे. पंतप्रधानांनी फक्त 9 मिनिटे लाईट बंद करण्यास सांगितले आहे. विजेचे अन्य उपकरणे मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रीड वर त्याचा परिणाम होणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

आपल्या राज्यात कोयनासारखे 9 मिनिटात सुरू व बंद होणारे वीज प्रकल्प आहेत. एस एल डी सी चे व केंद्र सरकारचे तांत्रिक अधिकारी यावर अभ्यास करीत आहे. राज्याकडे हुशार तांत्रिक अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पंतप्रधानांनी महामारी विरुद्ध सर्वाना एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक बाबी दाखवून त्यावर फाटे फोडू नयेत असेही बावनकुळे म्हणाले.