
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने या योजनेची E-KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत ठरवली आहे. उद्या तारीख संपल्यानंतर जे लाभार्थी E-KYC पूर्ण करणार नाहीत, त्यांचे महिन्याचे 1,500 रुपयांचे हप्ते तात्पुरते बंद होतील.
महिला व बालकल्याण विभागानुसार, योजना अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी E-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. अनेक महिलांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने विभागाने तातडीने E-KYC करण्याचे आवाहन केले आहे.
लाभार्थी महिला ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन E-KYC करू शकतात. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.
तांत्रिक समस्या आल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात जाऊनही E-KYC करता येते. यासाठी आधारसह आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.
सरकारने स्पष्ट केले आहे की अंतिम तारखेनंतर प्रक्रिया न केल्यास मिळणारा आर्थिक लाभ थांबेल. त्यामुळे सर्व लाभार्थींनी उद्यापूर्वीच E-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.








